‘त्या’ गुंडांची धिंड काढा; पोलीस प्रशासनाकडे संतप्त मागणी

। लोकजागर । फलटण । दि. 23 फेब्रुवारी 2026 ।

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहराचा लौकिक काल रात्री शंकर मार्केटमध्ये झालेल्या रक्तरंजित थराराने धुळीस मिळवला आहे. १० ते १२ जणांच्या टोळक्याने उघड्या तलवारी आणि शस्त्रांनी दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, या घटनेचे तीव्र पडसाद आज फलटणमध्ये उमटले आहेत. सुप्रसिद्ध ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील डॅशिंग ‘कडू साहेब’ ज्याप्रमाणे गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढतात, अगदी त्याचप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे या गुंडांना वठणीवर आणणार का, असा टोकदार सवाल आता फलटणकर विचारत आहेत. हातात शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या त्या ‘फटकुळ दादांची’ जुन्या गावठाणातून आणि शहरातून भरचौकात धिंड काढा, अशी आक्रमक मागणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे लावून धरली आहे.

शंकर मार्केट येथे गॅरेज चालवून आपला उदरनिर्वाह करणारे श्री. अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि श्री. संतोष हिरणवाळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना जाहीर निवेदन दिले. हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गुन्हेगारांवर तात्काळ ‘खुनाचा प्रयत्न’ आणि ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, असा अल्टिमेटम या निवेदनातून देण्यात आला असून, तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोपींना पाठीशी घातल्यास संपूर्ण ‘फलटण शहर बंद’ ठेवून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी उपस्थित नेत्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. नगरसेवक अझरुद्दीन ऊर्फ पप्पूभाई शेख यांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी करतानाच, “त्या पोरांचे नशीब की काल आम्ही तिथे नव्हतो, अन्यथा आम्ही त्यांना परत नुसते पाठवले नसते,” असे खळबळजनक विधान करत आपला संताप व्यक्त केला. माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर व्यवसाय आणि अवैध विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली, तर युवा नेते अमोल सस्ते यांनी शहरातील अवैध प्रकारांची पोलिसांना माहिती असूनही कारवाई होत नसल्याने पोलीसच यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब कापसे यांनीही या गुंडांचा बंदोबस्त करून त्यांची धिंड काढण्याची मागणी केली.

नागरिकांच्या आणि नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट केली. काल घडलेला प्रकार अतिशय वाईट असल्याचे सांगत त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके तत्काळ रवाना केल्याची माहिती दिली. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, जखमींची प्रकृती गंभीर असल्याने काल फिर्याद घेता आली नव्हती, मात्र आज ती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. “नागरिकांना अपेक्षित आहे तशीच आणि त्याहूनही कठोर कारवाई या गुंडांवर केली जाईल आणि शहरात पोलिसांची गस्त अधिक वाढवली जाईल,” असे आश्वासन अरविंद काळे यांनी यावेळी संतप्त नागरिकांना दिले.

Spread the love