रयत सेवक ही महाराष्ट्राची संपत्ती : ताराचंद्र आवळे

| लोकजागर | फलटण | दि. ११ एप्रिल २०२५ |

कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागातून व दूरदृष्टीतून रयत शिक्षण संस्था साकारली. आज रयतेचा वाढलेला वटवृक्ष पाहिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांची दूरदृष्टी किती महान होती हे लक्षात येते. रयत शिक्षण संस्थेमधील प्रत्येक सेवक हा माझी संस्था म्हणून काम करतो त्यामुळे रयत शिक्षण संस्था आज महाराष्ट्रासाठी दिशादर्शक व प्रेरणास्त्रोत आहे. रयत सेवकाचा विश्वास मन मेंदू मनगट व स्वावलंबावरती असल्यामुळे विद्यार्थी हे सक्षम व बहुआयामी तयार झालेले दिसतात. याचे श्रेय शिक्षकांच्याकडे जाते. रयत सेवक ही महाराष्ट्राची संपत्ती आहे असे मत रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बु. तालुका कोरेगाव येथे आण्णा शिवाजी पवार यांच्या नियत वयोमानानुसार सेवापूर्ती गौरव समारंभात प्रमुख वक्ते, माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षस्थानी डॉ दीपिका लेंभे होत्या तसेच व्यासपीठावर स्कुल कमिटी सदस्य सुरेशराव साळुंखे, अशोक लेंभे, रंजीत लेंभे, अमोल निकम, विकास साळुंखे, रयत शिक्षण संस्था उच्च शिक्षण विभागाचे प्रकाश पाटील, ऑडिट विभागाचे दत्तात्रय भोसले, रयत सेवक संघाचे सचिव अनिल खरात, डी.के. महाजन, प्रभाकर काकडे बाबुराव काकडे, रयत सेवक चंद्रकांत यादव, शंकर जाधव, देवानंद गोंजारी, नितीन टोणपे, मुख्याध्यापक साळुंखे एन.एस. पर्यवेक्षक घार्गे बी के यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, महाबळेश्वर वाडी तालुका माण या दुष्काळी भागातील अण्णा पवार यांचा प्रवास हा पालातून महालाकडे झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भांडी विकणे, भंगार गोळा करणे, खेकडे,मासे धरणे मिळेल ते काम करून रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून आयुष्याला आकार घेतला. शिपाई ते शिक्षक हा प्रवास त्यांचा थक्क करणार आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराचा पाईक व सच्चा रयत सेवक म्हणून त्यांना आण्णा या नावाने ओळखले जाते. कर्मवीर अण्णांच्या संस्थेने अनेक माणसे घडविलेली त्यापैकी एक म्हणजे आण्णा शिवाजी पवार.

यावेळी डॉ सौ दीपिका लेंभे, विकास साळुंखे, सेवक संघाचे सचिव अनिल खरात, उपशिक्षक पी. बी. ननावरे कु.मानसी भंडलकर कु. अस्मिता नावडकर यांची प्रमुख भाषणे झाली. आण्णा पवार यांचा मानपत्र शाल श्रीफळ बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शाळेला भात शिजवण्यासाठी मोठा टोप भेट दिला व शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न केला.

सत्काराला उत्तर देताना आण्णा पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेबद्दल नेहमीच माझ्या मनात कृतज्ञता असेल. अखेरच्या श्वासापर्यंत रयत सेवक म्हणून रयत शिक्षण संस्थेवर माझी निष्ठा असेल. मला रयत शिक्षण संस्थेने कमवा आणि शिका योजनेत हाताला काम दिले माझे शिक्षण झाले व माणूस म्हणून घडवले, मोठे केले याचा मला सार्थ अभिमान आहे.

पशिक्षक सी बी साळुंखे यांनी मानपत्राचे वाचन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री साळुंखे एम एस यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नाचण यु व्ही. यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, रयत सेवक, विद्यार्थी,पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love