सुजन फौंडेशनच्यावतीने पुरस्कार वितरण संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. १४ मे २०२५ ।
‘‘कोणाचे स्मरण करायचे, कोणाचे विचार पुढे न्यायचे व कोणाचे आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायचे याचा विचार पुरस्कारर्थींनी करावा. समाज बिघडवणार्यांच्या नव्हे तर समाज घडवणार्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे’’, असे विचार ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

सुजन फौंडेशन (आदर्की) आणि महात्मा फुले विचार अभियान तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना समाजाने दिलेल्या ‘महात्मा’ पदवीचे 132 वे वर्षे यानिमित्ताने विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणार्यांना ‘महात्मा फुले गौरव पुरस्कार’ व ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ वितरण समारंभ उपळेकर मंदीर सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सुळ, ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे उपस्थित होते. सुजन फौंडेशनचे अध्यक्ष अजितराव जाधव यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले.
बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘‘शेतकर्यांचे कैवारी आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण कार्यातील अग्रदूत महात्मा जोतीराव फुले आणि धार्मिक व सात्विकता जपून ब्रिटीशांशी लढा देणार्या साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी आज त्यांच्या नावचे पुरस्कार स्विकारले त्यांच्यावर महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. पहिले समाजप्रबोधक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्रातून स्त्रिशिक्षणाबाबत पहिला उच्चार केला. परंतु महात्मा फुले यांनी तो प्रत्यक्षात आणला. सध्या सामाजिक प्रबोधनाऐवजी, भारतीयत्वाच्या ऐवजी हिंदूत्त्वाचा उच्चार होत आहे. त्यातून एकसंघ समाज धर्म व जाती यावरुन दुभंगत आहे की काय अशी शंका येते. म्हणून या आदर्श मान्यवरांचे विचार आजच्या तरुण पिढीपुढे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता महत्त्वाची वाटते’’, असे सांगून ‘‘समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हे सुजन फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे’’, असे गौरवोद्गारही यावेळी बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, युवा उद्योजक मुनिश जाधव, पत्रकार विक्रम चोरमले, प्रवचनकार नवनाथ कोलवडकर, प्राचार्य मधुकर कोथंबिरे (माळेगांव), कांतीलाल भोसले, वनअधिकारी राहुल निकम, कृषी अधिकारी सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रभैय्या बरकडे (निरा), कटगुणचे माजी सरपंच सुधीर गोरे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक इम्तियाज तांबोळी, अक्षय अब्दागिरे यांना महात्मा फुले गौरव पुरस्काराने तर सुवर्ण परिसस्पर्श फाऊंडेशनच्या शबाना पठाण, ‘मल्हार’ पुस्तकाच्या लेखिका आम्रपाली कोकरे, सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई जाधव, माजी नगरसेविका वैशाली दादासाहेब चोरमले, माती व पाणी संशोधक डॉ.प्राजक्ता मेटकरी – खरात, आदर्श शिक्षीका शुभांगी बोबडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अक्षदा ढेकळे, जिल्हा परिषद शिक्षिका माधुरी सोनवलकर, सामाजिक कार्यकर्त्या निर्मला हिप्परकर, ग्रामविकास अधिकारी इंदुमती धायगुडे, निवृत्त मुख्याध्यापिका संगीता गोरड, संगिनी फोरमच्या प्रमुख अपर्णा जैन, प्रयाग सामाजिक संस्थेच्या प्रमुख सौ. प्रिती भोजने यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक ज. तु. गार्डे यांनी केले. दादासाहेब पडळकर व शुभांगी बोबडे यांनी प्रेरणादायी गाण्यातून आभार प्रदर्शन केले.
रविंद्र बेडकिहाळ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान….
महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार 2025 हा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना तर मुंबई सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे युनियन लीडर सुदामराव श्रीपती बनकर (पाडेगांव) यांना यावेळी रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार लोकजागर प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त सौ. अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते देण्यात आले.
