बाळशास्त्रींचे स्मरण अधिक व्यापक व्हावे

| लोकजागर |

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’ कार, पहिले समाजप्रबोधनकार, लोकशिक्षक व ग्रंथकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 17 मे 2025 रोजी 179 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने….

1818 साली हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधाननपद असलेली पुण्यातील पेशवाई ब्रिटीशांनी खालसा केली आणि इंग्रज सरकारचा (लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन गव्हर्नरचा) कारभार सुरु झाला. आपण पारतंत्र्यात गेलो तरी सुखी राहण्याच्या तडजोडीतून पाश्‍चात्यांची हुजरेगिरी करण्यासाठी अनेकांच्यात पाश्‍चिमात्य शासकाची भाषा इंग्रजी शिकण्याची चढाओढ लागली होती. परंतु काही कर्मठ ब्राह्मणवर्ग ‘न वदेत् यावनी भाषां । प्राणै: कष्टगतेरपि ॥ हे वाक्य घोकत गोर्‍या लोकांची ही पांढरी वाळवी आपला हिंदू धर्म फस्त करेल म्हणून इंग्रजी भाषेच्या नादाला लागूच नये या मतांचे होतेच.

स्वराज्याचे शासन व शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र पुण्यातून अर्थात मुंबईला गेले. पारतंत्र्यातील आपली अधोगती रोखायची असेल तर आपण धूर्तपणे इंग्रजी भाषा शिकली पाहिजे, पाश्‍चात्यांचे गणित, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, खगोल शास्त्र हे सारे शिकले पाहिजे, त्यातून विशाल दृष्टीचे सुजाण नागरिक स्वातंत्र्य व पारतंत्र्य यातील फरक ओळखतील व मग त्यांच्यात देशाभिमान जागृत होईल. त्यातून पुढे स्वातंत्र्याची उर्मी तरुण पिढीमध्ये निर्माण होईल; एवढी प्रचंड दूरदृष्टी फक्त महाराष्ट्राचे पहिले समाजप्रबोधनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याकडे होती. त्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र (6 जानेवारी 1832) व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ (1 मे 1840) सुरु केले आणि त्यातून मुंबईतील सुजाण नागरिकांची प्रबोधन फौज त्यांनी निर्माण केली की जी पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पाऊलवाट ठरली.

‘आपले राज्य कां गेले आणि इंग्रजांचे राज्य या देशात कां आले याचे अचूक निदान करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर होय’, असे प्रख्यात संपादक आचार्य प्र.के.अत्रे यांनी म्हटले होते. बाळशास्त्री जांभेकरांनी समाजसुधारणेची प्रेरणा राजा राममोहन रॉय यांच्या बंगालमधील सामाजिक सुधारणांपासून घेतली होती. त्यातूनच सुरु केलेल्या ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ च्या माध्यमातून त्यांनी निस्पृहपणे विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक सुधारणांवर लेख, अग्रलेख प्रसिद्ध केले. ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून स्त्रियांचे शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा शारीरिक, मानसिक छळ, मुलींचीसुद्धा मुंज, धार्मिक दुराग्रही चालीरिती, ख्रिश्‍चन धर्मात गेलेल्यांचे पुन्हा हिंदू धर्मात स्वागत, स्त्री – पुरुष समानता, हिंदुस्थानातील नाच – तमाशे, स्त्रियांना वेदाभ्यासाचा हक्क, सरकारी नोकरीत जातियता, पाश्‍चात्यांचे ज्ञान, विज्ञान, हिंदू धर्म आणि सतीची चाल इत्यादी विषयांवर त्यांनी चिकीत्सक भूमिकेतून परखडपणे लिखाण केले. तर ‘दिग्दर्शन’ या मासिकात रसायनशास्त्र, इतिहास, मोडी व बालबोध अक्षरांचे ताम्रपट, ज्योतिषशास्त्र, वाफयंत्रे, भूगोल, इंग्लंड देशाची राज्यस्थिती, विज्ञान, वर्तमानविषय अशा अनेक क्षेत्रातील उत्तम लेखांचा समावेश होता.

याचबरोबरच बाळशास्त्रींनी बाँबे नेटिव्ह एज्युकेशन, रॉयल एशियाटिक सोसायटी, एल्फिन्स्टन स्कूल, बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. एकूणच समाजसुधारणा, शिक्षण, लोकशिक्षण, संशोधन, साहित्य अशा विविध क्षेत्रात बाळशास्त्रींनी आपल्या अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात भरीव योगदान दिले होते. परकीय शक्तींच्या अंमलात असे योगदान देणारे हे व्यक्तीमत्त्व संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह असेच आहे.

या भूषणावह व्यक्तीमत्त्वाच्या वाट्याला मृत्यूपश्‍चात आलेली उपेक्षा खिन्न करणारी आहे; याचे कारण म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 146 वर्षे त्यांचे चिरस्थायी सार्वजनिक स्मारक ना त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या जन्मगावी, ना त्यांच्या मुंबई कर्मभूमीत, ना महाराष्ट्रात अन्यत्र कोठेही उभारले गेले. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेने पुढाकार घेतला आणि त्यांनी सन 1993 साली बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरण कार्य संशोधन वृत्तीतून एक व्रत म्हणून स्वीकारले आणि त्यामध्ये आजपर्यंत सातत्यही राखले आहे. यातूनच पोंभुर्ले येथे बाळशास्त्रींचे पहिले स्मारक उभारले गेले आहे. रविंद्र बेडकिहाळ यांच्याकडून बाळशास्त्रींच्या कार्यावर नव्याने त्रिखंडात्मक चरित्राची निर्मिती झाली आहे. संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रमातून बाळशास्त्रींच्या कार्याला उजाळा देण्याचे काम आजही गेली 35 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे.

अजूनही बाळशास्त्रींच्या उचित सन्मानासाठी व त्यांचे कार्य समाजमनात रुजण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने मुंबईत त्यांच्या भव्य – दिव्य स्मारकाची उभारणी होणे आवश्यक आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील नूतन सभागृहास बाळशास्त्रींचे नाव द्यावे, नियोजित मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कोकण विद्यापीठ बाळशास्त्रींच्या नावाने सुरु व्हावे, मुंबईत उभारल्या जात असलेल्या मराठी भाषा भवनमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मृती दालन उभारले जावे, मुंबई एशियाटिक सोसायटीशी त्यांचे पुरातत्त्व संशोधन व अभ्यास संबंधीचे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या मुंबई एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये रंगीत तैलचित्र लावले जावे, मुंबई विद्यापीठात यापूर्वी सुरु असलेले मात्र सद्यस्थितीत बंद असलेले बाळशास्त्री जांभेकरांच्या नावे अध्यासन सुरु व्हावे, शासनाच्या नियोजित पत्रकार विकास महामंडळास बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे, बाळशास्त्रींचे चरित्र आणि कार्य यावर माहितीपट निर्माण व्हावा या प्रमुख मागण्यांची कार्यपूर्ती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यासाठी प्रयत्नशील आहेच; पण राज्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या संघटनांनी यासाठी पाठपुरावा करुन त्या पूर्ण करुन घेणे हीच बाळशास्त्रींना योग्य श्रद्धांजली ठरेल.

  • रोहित वाकडे,
    विश्‍वस्त, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी.
    फलटण, जि. सातारा.
Spread the love