। लोकजागर । फलटण । दि. ३० मे २०२५ ।
जिल्ह्याचा विचार करता फलटण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे.आतापर्यंत झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यात सुमारे बाराशे ते तेराशे हेक्टरवर नुकसान झाल्याचे दिसते आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाला नुकसानीचे लवकरात लवकर सर्व्हेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाकडून नुकसानग्रस्त नागरीकांना तातडीने मदत देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात रस्ते, पूल, पिके आणि शेत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, डी. के. पवार, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी पूर्व भागातील आसू, गोखळी, गुणवरे येथील नुकसानग्रस्त भाग आणि फलटण शहरातील बाणगंगा नदीवरील हरिबुवा मंदीर येथील पूल, तसेच नदीकाठच्या शनिनगर भागातील पाणी शिरलेल्या आणि पडझड झालेल्या घरांची पाहणी करून नागरीकांशी संवाद साधला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरीकांना आश्वासित केले.
जिल्हयाच्या पश्चिमभागापेक्षा पूर्व भागात कमी पाऊस होतो.परंतु यावेळेस जिल्ह्याच्या पूर्व भागात अनपेक्षित जादा पाऊस झाला आहे.जिल्हयाचा विचार करता मे महिन्यात पडणार्या पावसाच्या सात ते आठपट पाऊस झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. फलटण तालुक्यात आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणाचा नुसार 1200 हेक्टरवर नुकसान झाल्याचे दिसते आहे, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यात केवळ तीन दिवसात तालुक्याच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या 95 टक्के एवढा पाऊस झाल्याने तालुक्याच्या सर्वच भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदी ओढ्यावरील पूल वाहून गेले आहेत. काही ठिकाणी भराव तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. विशेषत: उन्हाळ्यातील पालेभाज्या, फळबागांसह शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झालेली आहे. पशुधनाचा मृत्यू झालेला आहे. याकामी सर्व शासकीय यंत्रणा नुकसानीच्या सर्व्हेचे काम करत आहे. आगामी दोन – तीन दिवसात सर्व्हेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर शासनामार्फत निधीची तातडीने तरतूद करून नुकसानग्रस्त सर्व नागरीकांना मदत देण्यात येणार आहे असे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, 40 वर्षात एवढा मोठा पाऊस कधीच झाला नव्हता तो यावर्षी झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि नदी, ओढयावरील पूल, भराव यांचे नुकसान झाले. पिके आणि घरांची पडझड होऊन नुकसान झाले.
नदी, नाल्यांवरील अतिक्रमण हेच पूरस्थितीतील नुकसानीचे कारण आहे. यासाठी चारी काढणे, खोलीकरणाची कामे योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे. घरात पाणी शिरलेल्यांसाठी आणि घरांची पडझड झालेल्यांना तातडीची दहा हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. ती तातडीने देण्यात येणार आहे.
आमदार सचिन पाटील यांनी तालुक्यातील पूरस्थिती आणि नुकसानीचा आढावा यावेळी घेतला.