फलटण तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी

महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांची ना. मकरंद पाटील यांच्याकडे मागणी

। लोकजागर । फलटण । दि. 31 मे 2025 ।

अवकाळी पावसाने फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मिळावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्याकडे केली.

ना. मकरंद पाटील फलटण तालुक्याच्या पाहणी दौर्‍यावर आले होते त्यावेळी महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांनी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ना. पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

याबाबत माहिती देताना, ‘‘फलटण तालुक्यात मे 2025 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेत जमिनीचे अतोनात नुकसान झाले असल्याने बाधीत शेतकर्‍यांना तातडीने मदतीचा हात म्हणून हेक्टरी 50,000/- रुपये अर्थिक मदत मिळावी व पावसामुळे नागरिकांच्या राहत्या घराचेही नुकसान झालेले आहे. अशा बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) च्या वार्षिक अनुदानाच्या 10% पर्यंत निधी वापर करून राज्य शासनाच्या वतीने मदत मिळावी. अतिवृष्टीमुळे शेतातील माती, दगड वाहून गेल्या कारणाने बाधित शेतकर्‍यांना पुन्हा शेत जमीन तयार करण्यासाठी तलाव, धरण व इतर क्षेत्रातील गाळ, माती व दगड मोफत उपलब्ध करून देण्यात यावेत. रहिवासी क्षेत्रातील अनेक घरे पडझड झालेली आहेत त्यांना पक्के बांधकाम करण्यासाठी भरीव अर्थिक मदत मिळावी. कृषी खात्यामार्फत बी बियाणांचे मोफत वाटप करण्यात यावे व पीक अनुदान मिळावे. सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास तसेच शहर हद्दीतील नगरविकास विभागामार्फत तातडीने वाहून गेलेले रस्ते, पूल, साकव दुरुस्ती तसेच पुनर्निर्माण करण्यात यावे. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी’’, अशा मागण्या फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या असल्याचे महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांनी सांगितले.

Spread the love