। लोकजागर । फलटण । दि. 30 जून 2025 ।
फलटण शहरातून एक दिवसाच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरडकडे मार्गस्थ होताच प्रशासकीय पातळीवर विविध संस्थांच्या सहाय्यातून फलटणच्या पालखी तळासह वारी वाटेवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये पालखी तळावर 5 टन तर शहरात अन्य ठिकाणाहून 3 टन असा सुमारे 8 टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले की, स्वच्छतेसाठी फलटण नगर परिषदेचे 70 कर्मचारी, खाजगी तत्वावरील 25 कर्मचारी, सातारा जिल्ह्यातील कराड, महाबळेश्वर, मलकापूर या नगरपालिकांचे 100 कर्मचारी तसेच कागल नगरपरिषद (जि. कोल्हापूर) येथील 25 कर्मचारी, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेतील 150 विद्यार्थी यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली. कचरा संकलनासाठी पाच ट्रॅक्टर ट्रॉली, दोन जेसीबी मशीन, 16 घंटा गाड्या इतकी वाहने वापरण्यात आली. यावर्षी प्रथमच पालखी गेल्यानंतर दुर्गंध पसरू नये म्हणून बायो ओडो फ्रेश फवारणीचे काम करण्यात आले आहे.

जी.आय.एस. वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी कंपनीचे मुख्याधिकार्यांनी मानले आभार
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर प्लास्टिक सह कोणतीही घाण व कचरा वारीच्या वाटेवर राहू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या स्वच्छतेमुळे वारीची वाट पुन्हा चकाचक होत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने यंदा जी.आय.एस. वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला वारीच्या वाटेवरील स्वच्छता करण्याचे काम दिले आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा रविराज लायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे संचालक अमोल सुर्वे यांच्यासह शशिकांत शिंदे, स्वप्निल मुंढे, कैलास सारवान व यांचे 125 स्वच्छता कर्मचारी आळंदीपासून पालखीच्या मागे स्वच्छता मोहीम राबवत आहेत. फलटण शहरामध्येसुद्धा मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता या कंपनीकडून करण्यात आली.

पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा तसेच घाण व प्लास्टिक मोठ्या प्रमाणात साचत असते. यामुळे विविध आजार पसरू नयेत, यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. या स्वच्छता मोहिमेबद्दल सदर कंपनीला मुख्याधिकारी निखील मोरे यांनी धन्यवाद दिले.
