| लोकजागर | फलटण | दि. १३ सप्टेंबर २०२५ |
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५५व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या दरम्यान रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा कार्तिक शुद्ध एकादशी, रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथून घुमाणकडे प्रस्थान ठेवणार असून फलटण येथे पहिला मुक्काम असेल, अशी माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे यांनी दिली.

भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या रथयात्रा व सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून रविवार दि. २ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही वारी पार पडणार आहे.
या यात्रेचे औचित्य कार्तिक शुद्ध एकादशी, संत नामदेव महाराजांची ७५५ वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती साधणार आहे. सुमारे २५०० किलोमीटरच्या या यात्रेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेले आणि पन्नास वर्षांवरील वयाचे तब्बल ११० सायकलपटू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब या राज्यांतून ही रथयात्रा मार्गक्रमण करणार आहे. देशातील ही पहिली आध्यात्मिक सायकलवारी ठरत असून तिच्यामार्फत भागवत धर्मातील शांती, समता आणि बंधुता या मूल्यांचा संदेश दिला जाणार आहे.
या प्रसंगी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्त राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे तसेच सल्लागार डॉ. राजगोपाल खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
