फलटण नगरपरिषद : ‘स्थायी’सह सर्व विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

। लोकजागर । फलटण । दि. २ फेब्रुवारी २०२६ ।

नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) बाजूने कौल दिल्याने, सर्व समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या राजकीय घडामोडींमुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘खासदार गटा’ने नगरपालिकेवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. ही सभा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या निवडींमध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे. नगरपरिषदेचा गाडा हाकणाऱ्या महत्त्वाच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्षा प्रियदर्शिनी भोसले या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून कार्य पाहतील. तसेच स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सचिन अहिवळे, पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी राहुल निंबाळकर, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी संदिप चोरमले यांची वर्णी लागली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मोहिनी हेंद्रे आणि उपसभापतीपदी कांचन व्हटकर यांची निवड झाली असून, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या जबाबदारी सुपर्णा अहिवळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न मानली जाणारी ‘स्थायी समिती’ देखील आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर सर्व नवनिर्वाचित सभापती हे सदस्य म्हणून कामकाज पाहतील. याव्यतिरिक्त सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

आजच्या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे सभागृहात पाहायला मिळालेले राजकीय सौहार्द. सभेच्या सुरुवातीला विरोधी राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे शेवटच्या बाकावर बसले होते. मात्र, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आबांच्या ज्येष्ठत्वाचा आदर राखत त्यांना सन्मानपूर्वक पहिल्या रांगेत येऊन बसण्याची विनंती केली. नगराध्यक्षांच्या या आग्रहाचा स्वीकार करत गुंजवटे पहिल्या रांगेत विराजमान झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमधील या सामंजस्यामुळे राजकीय कटुता बाजूला सारून शहराच्या विकासासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा फलटणकरांमध्ये रंगली आहे.

Spread the love