उद्याच्या कालवा सल्लागार बैठकीत ठाम भूमिका मांडणार
। लोकजागर । फलटण । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।
‘‘निरा उजवा कालव्यातील फलटण, खंडाळा तालुक्याच्या हक्काचं पाणी इतर तालुक्याला देण्याचं काहीही कारण नाही. आमचा खिसा रिकामा करुन दुसर्याचा खिसा भरण्याची सुरु झालेली पद्धत योग्य नाही. या विरोधात उद्याच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यापुढं सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे’’, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘निरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी द्यावे. लाभ क्षेत्राव्यक्तीरिक्त इतरत्र पाणी वाटप करायचे असेल तर आधी निरा खोर्यातील पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत’’, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगोला तालुक्यातील किसंगी तलावात निरा – उजवा कालव्यातील पाणी सोडण्याची मागणी केली आहे तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्यातील माचनूर उपविभाग अंतर्गत शाखा क्र. 2 ला उन्हाळी आवर्तनासाठी नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत येणार्या पाटबंधारे प्रकल्पातून वाढीव पाण्याची मागणी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यावर उद्या पुणे येथे होणार्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकर्यांसमवेत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी प्रारंभी बैठक पार पडली. उद्या पुणे येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकस्थळी तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने जावून या मागणीला विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

…. त्यांनीही हे थांबवून दाखवावे : श्रीमंत रामराजे यांचे विरोधकांना आव्हान
आ. श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, ‘‘सांगोला तालुका भाटघरच्या लाभ क्षेत्रात नव्हता. पुरामुळे वाहून येणारे अतिरिक्त पाणी तत्कालिन आमदार गणपतराव देशमुख यांनी अथक परिश्रमातून सांगोला तालुक्याला मिळवून घेतलं. आज सांगोला तालुक्यात पाच विविध योजनांमधून पाणी मिळत आहे. सांगोल्याला पाणी द्यायला आम्ही कधीच विरोध केला नाही; पण ज्यांच्या जमिनी गेल्या, जे निरा – उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत त्यांच पाणी काढून सांगोल्याला देणं हे नैसर्गिक न्यायाला धरुन नाही. माळशिरस तालुक्यातील गावासाठी फलटण, खंडाळा तालुक्याचं पाणी कमी करायचं काही कारण नाही.हे पाणी कमी होत गेलं तर तालुक्यातील चार कारखान्यांना ऊस कोठून आणायचा हा प्रश्न तयार होईल. या प्रश्नाबाबत पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती पण त्यांनी ती बैठक घेतली नाही. ज्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत; आता त्यांचेच आमदार आहेत. त्यांनीही हे थांबून दाखवावं’’, असे आव्हानही यावेळी आ. श्रीमंत रामराजे यांनी विरोधकांना दिले.
पाणी वाढवून इतरांना द्या : आ. श्रीमंत रामराजे
‘‘निरा खोर्यात अजूनही पाणी उपलब्ध आहे. या जास्तीच्या पाण्यासाठी केंद्रीय स्तरावर बैठका होणे आवश्यक आहे. दिल्ली दरबार्यांनी जर ठरवलं तर लवाद बदलता येतात. लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोर्यात 3 ते 4 टी.एम.सी. पाणी वाढू शकते. याबाबतचा प्रस्ताव शासनात करुन देण्यामध्ये माझा मोठा पुढाकार होता. मात्र तो प्रस्ताव शासनात पडून आहे. आमचं पाणी इतरांना देण्यापेक्षा तुम्ही निरा खोर्यात पाणी आहे; ते पाणी वाढवा आणि खुशाल इतरांना द्या’’, असेही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रथेप्रमाणेच पाणी वाटप व्हावे : श्रीमंत संजीवराजे
‘‘उन्हाळ्यात किसंगी तलाव भरुन देण्याची मागणी झालेली आहे. ही चुकीची मागणी आहे. निरा उजवा कालव्याचे पाण्यावर आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे प्रथेप्रमाणेच यातून पाणी वाटप होणे गरजेचे आहे आणि हीच भूमिका सर्व शेतकरी ठामपणे घेणार आहेत, असे श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाईपलाईन मुळे वाचणारे पाणी आधी लाभ क्षेत्राला द्या : श्रीमंत संजीवराजे
“आता होऊ घातलेल्या पाईप लाईनद्वारे पाणी वितरणामुळे पाण्याची बचत होणार आहे. या बचत होणार्या पाण्याची मागणी इतर तालुक्यातून होत आहे. मात्र निरा – देवघर लाभक्षेत्रामध्ये पाणी पहिल्यांदा द्या, आणि त्यातून शिल्लक पाणी इतरांना द्यावं. मुळात फलटण तालुक्यातील निरा – देवघरच्या लाभ क्षेत्रातील 58 % भागालाच अद्याप पाणी मिळालेले आहे. त्यामुळे यातील उर्वरित 42 % लाभ क्षेत्राला पाणी वाटप करुन मग त्यातून जर पाणी शिल्लक राहिले तर ते इतरांना द्यावे अशी आमची भूमिका आहे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचा आधी विचार करा’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी सांगितले.