फलटणचा ‘साहित्यिक संवाद’ महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल : प्राचार्य विश्‍वासराव देशमुख

लेखक अतुल चव्हाण यांच्या ‘भयान राती’ कथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्राचार्य विश्‍वासराव देशमुख. सोबत सुरेश शिंदे, रविंद्र बेडकिहाळ, प्राचार्य रवींद्र येवले, अमोल अनासाने, ताराचंद्र आवळे, राहुल निकम, विकास शिंदे व मान्यवर.

मराठी भाषा दिनानिमित्त फलटणला २४ वा ‘साहित्यिक संवाद’ व ‘भयान राती’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।

‘‘‘साहित्यिक संवाद’ फलटणमध्ये होतोय ही अभिमानाची व दिशा देणारी घटना आहे. या उपक्रमास अनेक साहित्यिकांनी भेट देऊन स्वतःला व्यक्त केले आहे व यातून नव्या साहित्यिकांना बळ देण्याचे काम झालेले आहे. २४ वा साहित्यिक संवाद हा फार मोठा टप्पा या उपक्रमाने पूर्ण केलेला असून फलटणचा ‘साहित्यिक संवाद’ हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल’’, असा विश्‍वास मुधोजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विश्‍वासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

येथील साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रम व लेखक अतुल चव्हाण लिखीत ‘भयान राती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम येथील नाना – नानी पार्क मध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्राचार्य देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्जा’कार सुरेश शिंदे होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, प्राचार्य रविंद्र येवले, फेडरल बँकेचे फलटण शाखा व्यवस्थापक अमोल अनासाने, महादेवराव गुंजवटे, अ‍ॅड. वीरसेन सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक तथा माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम, प्रा. श्रेयस कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेखक, कवी अतुल चव्हाण यांच्या ‘भयान राती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला ‘साहित्यिक संवाद’ उपक्रमाच्या आयोजनाबद्दल ताराचंद्र आवळे, राहुल निकम यांचा तर पुस्तक प्रकाशनाबद्दल लेखक अतुल चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्राचार्य विश्वासराव देशमुख म्हणाले की, ‘‘साहित्याला गरीब – श्रीमंत हा भेद नसतो. मन संवेदनशील होते तेव्हा साहित्यकृती उदयास येते. साहित्य ही कोणाचीही मक्तेदारी नाही. साहित्यामध्ये शहरी व ग्रामीण हा भेद न मानता जे सुचेल ते मांडता आले पाहिजे. साहित्यिकाला व्यक्त होता आले पाहिजे. त्यासाठी त्याचे वाचन प्रचंड असले पाहिजे. वाचन हे साहित्य संस्कृती समृद्ध करण्याचे प्रभावी माध्यम आहे’’, असे सांगून ‘‘अतुल चव्हाण यांचा ‘भयान राती’ हा कथासंग्रह आपला ठसा उमटवेल असा विश्वास वाटतो. त्यांची प्रत्येक कथा ही आपल्या जवळची वाटते. या कथासंग्रहाचे प्रकाशन हे ‘साहित्यिक संवादा’मध्ये होते हा दुर्मिळ योगायोग आहे’’, असेही प्राचार्य देशमुख यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात सुरेश शिंदे म्हणाले, ‘‘फलटणचा साहित्यिक संवाद हा आगळावेगळा असून यामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळते आणि त्यामुळेच लेखक अतुल चव्हाण यांच्या ‘भयान राती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन आज होत आहे. प्रत्येक साहित्यिकाला फलटणचा ‘साहित्यिक संवाद’ हा आपल्या जवळचा वाटतो. दर महिन्याला सर्व साहित्यिक एकवटून अतिशय मुक्तपणे या ‘साहित्यिक संवादा’ मध्ये भाग घेतात, चर्चा करतात व आपली मते प्रदर्शित करतात.’’

रवींद्र बेडकीहाळ म्हणाले, ‘‘फलटणचा साहित्यिक संवाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये याचा नामोल्लेख झाला ही गौरवाची बाब आहे. संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या चिकाटीतूनच हा साहित्यिक संवाद आज पर्यंत टिकून राहिला आहे. तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. प्रत्येक महिन्याला नवीन संकल्पना घेऊन साहित्याला नवी दिशा देण्याचे काम ते करतात ही गौरवाची बाब आहे.’’

प्राचार्य रवींद्र येवले म्हणाले, ‘‘भयान रातीचे प्रकाशन हे रात्रीच्या प्रसंगी होते हा दुर्मिळ योगायोग आहे. मराठी भाषा गौरव दिन व अमावस्या हा ही एक योगायोग आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना बळ देण्याचे काम या साहित्यिक संवादातून होत आहे. अतुल चव्हाण यांच्या हातून अशाच साहित्य कृती निर्माण व्हाव्यात व त्यांचे साहित्य जगभर पसरावे.’’

महादेवराव गुंजवटे, कवयित्री आशाताई दळवी, लेखक अतुल चव्हाण, सुधीर इंगळे, बँक मॅनेजर अमोल अनासाने, श्रेयश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी करून आत्तापर्यंत झालेल्या २३ साहित्यिक संवाद कार्यक्रमांचा आढावा घेतला. आपण काय करतोय आणि काय केले पाहिजे यावरही भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज. तु. गार्डे यांनी केले तर आभार रानकवी व नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांनी मानले.

यावेळी हरिराम पवार, हनुमंत मोरे, डॉ. तुषार शिंदे, विकास शिंदे, गणेश तांबे, गणेश शिंदे, काशिनाथ ढेंबरे, महेश ढेंबरे, सचिन जाधव, मंगेश कर्वे तसेच फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Spread the love