| लोकजागर | फलटण | दि. ११ एप्रिल २०२५ |
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती फलटण शहरातील जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करून त्यांना अभिवादन केले.

भगवान महावीर यांनी ‘अहिंसा परमो धर्म’ हा संदेश संपूर्ण जगाला दिला. तसेच संपूर्ण आयुष्यभर अहिंसा, सत्य, आचार्य व ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच व्रतांचे पालन केले. भगवान महावीर यांनी दिलेली अहिंसेची शिकवण ही सर्व जगाला सुख, शांती देणारी असून अहिंसेमुळे आपला व सर्व मानवजातीचा उद्धार होऊन अहिंसा हाच मानव जातीचा खरा धर्म व कर्म मानले जाते.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करून सकाळी भगवान महावीरांच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात, झांजपथक, लेझीम पथक व भव्य देखाव्यांसह वाजत-गाजत फलटण शहराच्या प्रमुख चौकांमधून काढली होती. यावेळी फलटण शहरातील भगवान महावीर स्तंभाजवळ सर्व जैन धर्मीय बांधव, भगिनी यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन भगवान महावीर स्तंभाला अभिवादन केले.
दरम्यान, महावीर जयंतीच्या निमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील भगवान महावीर स्तंभ येथे अभिवादन केले. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने फलटण येथील महावीर स्तंभ येथे भगवान महावीर यांना अभिवादन केले. यावेळी महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
