। लोकजागर । सातारा । दि. 3 जून 2025 ।
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने शेतक-यांची फसवणूक व अतिरिक्त लुट होऊ नये या करिता सातारा जिल्हयामध्ये कृषी विभागामार्फत १२ भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करणेत येते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

कृषी निविष्ठा तक्रार निवारण फलकावर शेतक-यांनी आपली तक्रार विविध प्रकारे नोंदविता येवू शकते. ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअप व्दारे तक्रार नोंदविता येते. ७४९८९२१२८४ या मोबाईल क्रमांकावर फोन करुन शेतकरी तक्रार नोंदवू शकतात.तसेच क्युआर कोड स्कॅन करुन त्यावर येणारा छोटासा गुगल फॉर्म भरुन शेतक-यांनी तक्रार दाखल करुन घेतली जाणार आहे.
कृषी निविष्ठा केंद्रावर मुख्य निविष्ठेसोबत इतर निविष्ठा खरेदी करिता सक्ती ( लिकिंग ) केल्यास, कृषी निविष्ठा देण्यास टाळाटाळ केल्यास, खरेदीची पावती देण्यास नकार दिल्यास किंवा गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास शेतक-यांनी आपली तक्रार नोंदवावी. शेतक-यांच्यातक्रारीचे निराकरण कृषि विभागामार्फत केले जाणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी कळविले आहे.
