। लोकजागर । फलटण । दि. 4 जून 2025 ।
फलटण शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदी व खडकहिरा ओढा ओव्हरफ्लो झाला होता. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिल्यामुळे पाण्यासोबत कचरा, छोटी झाडे, वनस्पती वाहत आल्या होत्या. नदी आणि ओढ्याच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह आता थांबल्यानंतर या ठिकाणी फलटण नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

फलटण शहराच्या हनुमान नगर, शुक्रवार पेठ, मलठण या रहिवासी परिसरातून बाणगंगा नदीचे पात्र आहे. एरव्ही कोरडी असणारी नदी अतिवृष्टीमुळे प्रवाहित झाल्याने नदीपात्रासह कठावर मोठ्या प्रमाणावर कचरा व झाडे – झुडपे अडकून राहिल्याचे चित्र दिसून येत होते. हीच परिस्थितीत खडकहिरा ओढ्यामध्येही पहायला मिळत आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पालिका प्रशासनाने या ठिकाणच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले असून मुख्याधिकारी निखील मोरे यांच्या मार्गदर्शनात पालिका अॅक्टीव्ह मोडवर पहायला मिळत आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
