भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे : विजय मांडके

| लोकजागर | सातारा | दि. ११ सप्टेंबर २०२५ |

“१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात सातारच्या क्रांतिकारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या असीम त्याग आणि बलिदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी केले.

कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा आणि जिज्ञासा इतिहास संवर्धन व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फाशीचा वड येथे आयोजित सातारा क्रांतिदिन अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड व जिज्ञासाचे कार्यवाह निलेश पंडीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजय मांडके म्हणाले, “१८५७ च्या उठावात सातारच्या १७ क्रांतिकारकांना इंग्रजांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवत ८ सप्टेंबर १८५७ रोजी गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे शिक्षा दिली. हा दिवस केवळ साताऱ्यापुरता मर्यादित नसून देशाच्या इतिहासातील क्रांतिकारी दिवस आहे. या उठावात सहभागी झाल्याबद्दल क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दुर्दैवाने आजही त्यांच्या वारसदारांना न्याय मिळालेला नाही.”

ते पुढे म्हणाले, “या उठावात समाजातील सर्व घटकातील क्रांतिकारकांचा सहभाग होता. त्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत. विद्यार्थ्यांनी या क्रांतिकारी वारशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांना अभिवादनाने झाली. निलेश पंडीत यांनी या उठावातील घटनांचा आढावा सादर केला. डॉ. राजेंद्र सातपुते यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. गौतम काटकर यांनी आभार मानले.

या प्रसंगी प्रा. राजेंद्र घाडगे, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. विजय पवार, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. भरत जाधव, डॉ. मनिषा जाधव, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. संदीप पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love