माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध; आमदार सचिन पाटील यांनी तहसील कार्यालयात घेतला आढावा

१३ तक्रारींचा जागीच निपटारा केल्याने माजी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण

। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।

“देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे, ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे. आपल्या तालुक्यातील माजी सैनिकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल. माजी सैनिकांनी त्यांच्या कोणत्याही समस्या माझ्याकडे मांडाव्यात, त्या निश्चितपणे सोडवल्या जातील,” असे आश्वासन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी दिले. फलटण तहसील कार्यालयात आयोजित माजी सैनिकांच्या अडीअडचणींबाबतच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

सैनिकांना कचेरीत हेलपाटे मारावे लागू नयेत: कर्नल सतीश डांगे

या बैठकीला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, तालुक्यातील माजी सैनिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर शक्यतो जागीच तोडगा काढला जावा. देशासाठी तरुणपण देणाऱ्या सैनिकांना शासकीय कचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत, याची काळजी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी एकाच वेळी माजी सैनिकांच्या समस्या ऐकून घेत असल्याने सैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

२० तक्रारींपैकी १३ प्रकरणांचे जागीच निवारण

या ऐतिहासिक बैठकीत तालुक्यातील माजी सैनिकांनी एकूण २० तक्रारी मांडल्या. आमदार सचिन पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या तक्रारींची तत्काळ दखल घेत १३ तक्रारींचे जागीच निवारण केले. उर्वरित तक्रारींपैकी ३ प्रकरणे न्यायप्रविष्ट असून ४ तक्रारींबाबत कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी श्री. बोंबले, पोलीस निरीक्षक श्री. काळे व श्री. जगताप, तसेच वनविभागाच्या आरएफओ निकिता बोटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सांगता

बैठकीच्या शेवटी, सातारा जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांत वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांना सर्व उपस्थित मान्यवर आणि माजी सैनिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रगीताने या यशस्वी बैठकीची सांगता करण्यात आली. अशा प्रकारच्या थेट संवादाच्या उपक्रमामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि सैनिक वर्गात सकारात्मक संदेश गेला असून प्रशासकीय कामात गतिमानता आल्याचे पाहायला मिळत आहे.


Spread the love