। लोकजागर । फलटण । दि. 21 मार्च 2026 । अभिष्टचिंतन विशेष लेख ।
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची नाही, तर अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी आहे – आणि ही जबाबदारी गेली ४२ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडणारे नाव म्हणजे दैनिक गंधवार्ता चे संस्थापक तथा ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे.
सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मध्ये कार्यकारी संपादक म्हणून शामराव अहिवळे यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. अनिल साबळे आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकातून त्यांनी आपल्या लेखणीची धार सिद्ध केली. त्यानंतर १९८७ साली फलटण येथे त्यांनी साप्ताहिक गंधवार्ता ची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हे वृत्तपत्र सातत्याने आणि यशस्वीपणे पुढे जात राहिले. १९९४ मध्ये गंधवार्ताचे दैनिकात रूपांतर करून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला.
मागील ४२ वर्षांपासून शामराव अहिवळे यांनी निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपला आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी नेहमीच समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले. शासकीय अधिकाऱ्यांची लाचखोरी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, अतिक्रमण, आरोग्य सुविधा तसेच महिलांवरील अन्याय अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आणि प्रशासनाला जागे केले.
शामराव अहिवळे यांच्या राजकीय लिखाणाची खासियत म्हणजे त्यांच्या म्हणी, पद्यात्मक हेडिंग आणि प्रभावी मांडणी. राजकिय नेतेमंडळीच्या समाज उपयोगी निर्णयांना प्रसिद्धी देऊन पाठबळ दिले तर चुकीच्या निर्णयाचा वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर पंचनामा केला. यामध्ये कित्येक वेळा त्यांच्यावर वर खोट्या केसेस करण्यात आल्या परंतु न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय देऊन त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले.
पत्रकारितेबरोबरच त्यांनी संघटनात्मक कार्यातही मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक-मुद्रक-संपादक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पत्रकारांच्या हक्कांसाठी विविध आंदोलनात सहभाग घेतला, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी लढा दिला तसेच फलटण एस.टी. आगाराच्या अनागोंदी कारभाराविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदवला.
आंबेडकरी चळवळीत देखील शामराव अहिवळे यांनी मोलाचे योगदान दिले. फलटण शहरात दलित पॅंथरच्या स्थापनेपासून त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेऊन न्याय मिळवण्यासाठी लढा दिला. अन्यायाविरोधात उभारण्यात आलेल्या चळवळींचे लिखाण करून या चळवळींना, वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी पोहचवण्याचे महत्वाचे काम त्यांनी लिखाणातून केले.
शामराव अहिवळे यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, फलटण यांच्याकडून सन्मान, २०१७ मध्ये भीमस्फूर्ती पुरस्कार, २०१९ मध्ये मूकनायक पुरस्कार आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठित ज्येष्ठ संपादक दर्पण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
आजच्या वाढदिवसानिमित्त
समाजहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि पत्रकारितेचा आदर्श जपणाऱ्या ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या लेखणीला अजून अधिक बळ मिळो आणि समाजासाठी त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.
