| लोकजागर | फलटण | दि. ७ ऑगस्ट २०२५ |
भारताच्या हरितक्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सासकल येथे गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रगतशील बागायतदार तुकाराम मुळीक, नामदेव मुळीक, अरुण घोरपडे, मधुकर घोरपडे, दिलीप फडतरे, दादासो मुळीक, महादेव फरांदे, मंगल घोरपडे यांसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

सहाय्यक कृषी अधिकारी (सासकल), कृषी सेवारत्न सचिन जाधव यांनी या प्रसंगी डॉ. स्वामीनाथन यांचे शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, हरितक्रांतीतील भूमिकेची सविस्तर माहिती दिली. “७ ऑगस्ट हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करून टिकाऊ व वैज्ञानिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाविषयीही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

यावेळी प्रगतशील बागायतदार तुकाराम मुळीक यांच्या हस्ते डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत, “डॉ. स्वामीनाथन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करावी,” असे आवाहन केले.