फळांचे गाव ‘धुमाळवाडी’ इतर गावांसाठी आदर्श : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

। लोकजागर । फलटण । दि. २४ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘फळांचे गाव ‘धुमाळवाडी’ इतर गावांसाठी आदर्श असल्याचे’’, असल्याचे गौरवोद्गार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व्यक्त केले.

कृषि विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नाविन्यपूर्ण बाब म्हणून कृषी प्रदर्शनामध्ये ११ स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील फलटण तालुक्यातील फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘धुमाळवाडी’ प्रतिकृती स्टॉलला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

सदर भेटी दरम्यान शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या विविध फळ पिकांविषयी माहिती घेत त्यांनी कष्ट व परिश्रमाच्या जोरावर फळबाग लागवड करून एक आदर्श इतर गावांसाठी ठेवला असल्याचे सांगून त्यांनी शेतकर्‍यांचे व कृषि विभागाचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांनी फळांचे गावाविषयक माहिती जाणून घेतली. गावातील फळंपिकाची सविस्तर माहिती महेंद्र धुमाळ, सुशील फडतरे, दत्तात्रय धुमाळ, समीर पवार, त्रिंबक फडतरे यांनी दिली. यावेळी कृषिसेवा रत्न सचिन जाधव यांनी या गावात कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत घोषित करण्यात आलेले, फलटणच्या दक्षिण दिशेला असलेल्या या धुमाळवाडी गावात १९ प्रकारची फळे सलग व ६ प्रकारची फळं झाडे बांधावर अशी एकूण 26 प्रकारचे फळझाडे लागवड या ठिकाणी केलेली आहे. याबाबत फ्लेक्सद्वारे सविस्तर माहिती देणारे स्टॉल तयार करण्यात आले होते. स्टॉलमध्ये शेतकर्‍यांनी पिकविलेल्या फळांच्या टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीवेळी प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, फलटण उपविभागीय कृषी अधिकारी खलीद मोमीन, फलटण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Spread the love