वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा : ना. जयकुमार गोरे

सातारा जिल्ह्यातील पालखी तळांची केली पाहणी

। लोकजागर । फलटण । दि. 7 जून 2025 ।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची संख्या मोठी असणार आहे. वारकर्‍यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वारकर्‍यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिल्या.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्ह्यातील बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा दत्त घाट पालखी तळांची पहाणी ना. गोरे यांनी केली. त्यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना निर्देश देताना ते बोलत होते. या पाहणी प्रसंगी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे, या पावसापासून वारकर्‍यांचा बचाव व्हावा यासाठी दहा हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत ती कामे ताडीने पूर्ण करावीत त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेर्‍यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी ना. गोरे यांनी केल्या.

Spread the love