९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले

साहित्य संमेलन देखणे आणि दिमाखदार करुन दाखवू : ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले

। लोकजागर । सातारा । दि. 16 जून 2025 ।

मराठ्यांची चौथी राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान सदर निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना, “मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या दोन्ही संस्थांनी मला माझ्या वडिलानंतर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा फार मोठा बहुमान दिला आहे. या दोन्ही संस्था, विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. शताब्दीपूर्व साहित्य संमेलन राजधानी सातारा येथे सर्व जिल्हावासियांच्या सहकार्याने अतिशय देखणे आणि दिमाखदार करुन दाखवू. अभिजात मराठी भाषेच्या उत्सावासाठी देश, परदेशातील सर्व मराठी बांधवांना साताऱ्यात येण्याचे निमंत्रण मी देतो, सर्वांचे स्वागत आम्ही जोरदारपणे करु”, असे ना. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.

या बैठकीस मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सदस्य वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार, अनिल जठार, तुषार महामूलकर उपस्थित होते.

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मसाप, शाहूपुरी शाखेच्या स्थापनेपासून तसेच शहर, जिल्हयातील साहित्य चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख पत्रे लिहिण्याच्या मोहिमेचा शुभारंभही श्री.भोसले यांच्या हस्ते झाला होता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला आहे. मसाप शाहूपुरी शाखेने आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन यशस्वी कर ण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली . साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी त्यांनी सलग १२ वर्षे मसाप, शाहूपुरी शाखेच्या प्रस्तावाला पाठिंब्याचे पत्र देऊन त्याचा पाठपुरावाही केला होता. त्यांच्या या सर्व कार्याची, मराठी भाषेविषयी असलेली प्रेमाची दखल घेऊन त्यांची ९९ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहितीही श्री. कुलकर्णी यांनी दिली. तसेच या निर्णयाची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह. सुनिताराजे पवार यांना देण्यात आली आहे. त्यांनीही या निवडीबद्दल मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

दुग्धशर्करा योग

साताऱ्यात यापूर्वी ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९३ साली झाले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून दिवंगत श्री.छ.अभयसिंहराजे भोसले यांनी काम पाहिले होते. स्व. अभयसिंहराजेंनंतर त्यांच्या मुलाला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना स्वागताध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. साहित्य संमेलनाच्या ९९ व्या वर्षाच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा दोघेही स्वागताध्यक्ष होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. साहित्य क्षेत्रातील हा दुग्धशर्करा योग पुन्हा सहज जुळून येईल असे वाटत नाही त्यामुळे सातारा जिल्हयात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

Spread the love