शिक्षकांनी वारकर्‍यांची आनंदाने सेवा करावी : धनंजय चोपडे

मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची बैठक संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. 22 जून 2025 ।

‘‘वारकर्‍यांना सेवा देणे हीच आपली या पालखी सोहळ्यातील ईश्वर सेवा मानून आनंदाने सेवा करावी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकर्‍यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगण्यासाठी तसेच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या पालखी सोहळ्यात सर्व शिक्षकांनी सेवा करावी’’, असे आवहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांनी केले.

मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज लोणंद येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रचार व प्रसार तसेच पालखी सोहळा नियोजन 2025 ची बैठक गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी संपन्न झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन धनंजय चोपडे मार्गदर्शन करत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, खंडाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अनिस नायकवडी यांनीही पालखी सोहळ्यातील नियोजनाची माहिती खंडाळा व फलटण तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना दिली. ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत पालखी मार्गावरील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने साक्षरतेची घोषवाक्य देऊन करावे, असे सांगून विविध पथनाट्य, घोषवाक्य, बॅनर्स, लोगो इत्यादी तयार करून साक्षरतेचा प्रचार करण्याचे आवाहन नायकवडी यांनी केले.

गजानन आडे व अनिल संकपाळ यांनी वारीतील कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तर स्पष्ट करून पालखी समोर घोषवाक्य, चित्ररथ तसेच साक्षरता गीते सादर करून पालखीचे स्वागत करावे असे आवाहन केले. तसेच असाक्षर वारकर्‍यांचे फॉर्म भरून नोंद करण्यास सांगितले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी केले. या कार्यक्रमास खंडाळा व फलटण तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपप्राचार्य आबाजी धायगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राध्यापक महेश जाधव यांनी केले.

Spread the love