| लोकजागर | फलटण | दि. १२ सप्टेंबर २०२५ |
“निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे नव्हे, तर सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय हलगर्जीपणा, भ्रष्टाचार आणि मानसिक छळाचा थेट परिणाम असून, तो ‘संस्थात्मक खून’ आहे,” असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार अमर साबळे यांनी केला. फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद प्रशासनावर जोरदार टीका करताना साबळे म्हणाले, “ऑनलाइन बदली प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याऐवजी, दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीच्या नावाखाली शिक्षकांचा अमानुष छळ सुरू आहे. सचिन काकडे यांच्याकडे अपघातामुळे आलेले ४१ टक्के दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असतानाही, २०२४ चे नियम लावून ते अन्यायकारकपणे २९ टक्क्यांवर आणण्यात आले.”
ते पुढे म्हणाले, “शिक्षकांना निलंबन व पोलीस कारवाईच्या धमक्या देत, त्यांच्याकडून पैशांची उकळी सुरू आहे. कराड येथील हॉटेलमध्ये बसून ‘अपात्र दिव्यांग’ यादीतून नावे वगळण्यासाठी लाच मागितली जात आहे. हा प्रकार म्हणजे अक्षरशः ‘मुगलशाही’ असून, आम्ही हे सहन करणार नाही.”
साबळे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला : “जर दिव्यांग प्रमाणपत्रे बनावट असतील, तर ती प्रमाणपत्रे देणाऱ्या मूळ वैद्यकीय मंडळांवर कारवाई का केली जात नाही? न्यायालयात दाद मागणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. विशिष्ट जातीच्या शिक्षकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हा प्रकार थांबला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करू.”
“शिक्षकांवरील छळ तात्काळ थांबवावा, तसेच सचिन काकडे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी ठाम मागणीही अमर साबळे यांनी यावेळी केली.
