महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून; आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी.
। लोकजागर वृत्त । पुणे । २२ ऑगस्ट २०२६ ।
राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला गेला. या कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या आणि कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला; तरीही ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भाजपाने राहुल गांधी यांचा धसका घेतला असल्यानेच त्यांच्या कार्यक्रमात अडथळे आणले, पण भाजपाच्या नाकावर टिच्चून हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला.
राहुल गांधी यांचे दुपारी पुण्यात आगमन झाले, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह नेते व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात मुलींशी संवाद साधला तसेच त्यांचे प्रश्न, समस्या व व्यथा जाणून घेतल्या.
“भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित लोक मुली आणि स्त्रिया पिंजऱ्यातच बंदिस्त राहाव्यात या मानसिकतेचे आहेत, पण असा भारत आपल्याला नको आहे. आपल्याला अशी व्यवस्था हवी आहे जिथे प्रत्येकाशी आदराने वागले जाईल. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे आणि आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध आहे,” असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात केला.
राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या स्थितीबद्दल भाष्य करत त्यांचे हक्क कसे नाकारले जात आहेत ते सांगितले. ते म्हणाले, “हजारो वर्षांपासून देशात महिलांना त्यांचे हक्क व अधिकार नाकारण्यात आले. मनुस्मृती महिलांना स्वतंत्र असू नये असे म्हणते, पण महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यातच मोठी ताकद आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. मुलीचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी नाते असू शकते, पण त्या त्यांची मालमत्ता नाहीत; त्या स्वतःच्या आहेत.”
समाजात महिलांना प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जात असल्याचे सांगत त्यांनी या हिंसाचाराचे तीन प्रकार स्पष्ट केले:
- शारीरिक हिंसाचार: दरवर्षी ४.५ लाख स्त्री-भ्रूणहत्या केल्या जातात. ८०% महिलांना छळाचा सामना करावा लागतो, २९% महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात आणि ६% महिलांवर बलात्कार होतो.
- संधी नाकारणारा हिंसाचार: सुरक्षिततेच्या नावाखाली ५०% महिलांना शिक्षण किंवा रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात.
- आर्थिक हिंसाचार: सुरक्षित प्रवासाच्या नावाखाली दरवर्षी अतिरिक्त १७,५०० रुपयांचा खर्च करावा लागतो.
देशात महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, ६०% महिलांना एकट्या घराबाहेर जाण्याचे स्वातंत्र्य नाही. ४५% महिलांना लग्न किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण वा काम सोडावे लागते आणि केवळ ८% महिलांकडे जमिनीची मालकी आहे. तसेच सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे लैंगिक हिंसाचाराच्या ९९% घटनांची नोंदच केली जात नाही, ८४% महिलांना नोकरीसाठी कुटुंबाची परवानगी घ्यावी लागते आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न २५% कमी असून त्यांना सहजपणे पदोन्नती मिळत नाही.
“जेव्हा मी पुरुषांशी बोलतो, तेव्हा मला असे आढळते की स्त्रियांना अनेकदा केवळ तीनच चौकटींत पाहिले जाते: मुलगी, पत्नी किंवा आई. या पैकी कोणत्याही भूमिकेत काहीही गैर नाही, पण या तुमच्या एकमेव ओळखी असू शकत नाहीत. स्त्रिया या व्यावसायिक, खेळाडू, नेत्या, निर्मात्या आणि उद्योजिका अशा अनेक भूमिका निभावणाऱ्या असतात; तरीही त्यांची ओळख केवळ एखाद्या पुरुषाशी असलेल्या नात्यावरूनच ठरवली जाते,” असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
