। लोकजागर । फलटण । दि. 0७ फेब्रुवारी २०२५ ।
‘‘फलटण तालुक्यातील निंभोरे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणे हे फलटणसह सातारा जिल्ह्याचे भाग्यच आहे. आगामी अंर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करुन शासनाने या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करावे’’, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी शासनाकडे केली आहे. सदर मागणीबाबतचे निवेदन त्यांनी फलटणचे नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे यांचेकडे सुपूर्द केले.
आपल्या निवेदनात अॅड. खरात यांनी नमूद केले आहे आहे की, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिनांक ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. तेव्हा महाराष्ट्रातील काही माननीय पँथर मुंबईवरून माघारी जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आपापल्या बरोबर घेऊन गेले. त्यामध्ये अमरावती, हातकणंगले, मुंबई, लातूर, सोलापूर या ठिकाणांसह फलटण तालुक्यातील निंभोरे गावाचा समावेश आहे. या ठिकाणी अस्थिकलशांची स्थापना त्या त्या ठिकाणच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केली होती. निंभोरे येथेही समाज मंदिरात अस्थी कलशाची स्थापना केलेली आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र याठिकाणी उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही तसेच गाड्या पार्किंग साठी जागा नसल्याने भीम अनुयायांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असते.’’
‘‘निंभोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणे म्हणजेच आपल्या फलटण तसेच सातारा जिल्ह्याचे भाग्यच आहे. त्यामुळे या ठिकाणी किमान २ ते १० एकर जमीन सरकारने संपादित करावी. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारुन अस्थी कलश स्थापन करावा. या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट सांगणारी थ्रीडी कलाकृती, प्रोजेक्टरद्वारे माहितीपट, संग्रहालय, मोठे ग्रंथालय, मोठा सभा मंडप, स्वच्छ पिण्याचे पाणी, पार्किंग इत्यादी सोयी उपलब्ध कराव्यात’’, अशीही मागणी अॅड. खरात यांनी केली आहे.
‘‘या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल प्रेरणा घेऊन जाईल अशी प्रेरणाभूमी उभी करण्यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील चारही कॅबीनेट मंत्र्यांनी, जिल्ह्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना, तारांकित किंवा अतारांकित प्रश्न उपस्थित करून भरघोस निधींची तरतूद करण्यास शासनाला भाग पाडावे’’, असे आवाहनही अॅड. खरात यांनी निवेदनात केले आहे.
दरम्यान, सदरचे निवेदन फलटण तहसिल कार्यालयात देतेवेळी अॅड. कांचनकन्होजा खरात यांचे समवेत सहकारी अमर खंदारे, श्रीकांत गावडे व किरण उपस्थित होते.