निरोप समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दमयंती कुंभार.
। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।
“शाळेतील प्रत्येक मूल हे वेगळे असते. मात्र या प्रत्येक मुलाकडे वेगवेगळ्या क्षमता असतात. या क्षमतांचा विकास होणे काळाची गरज आहे. त्यासाठी मुलांनी योग्य मार्गाने चालून जीवनामध्ये सकारात्मकता जोपासली पाहिजे. दहावीची परीक्षा ही आयुष्यातली पहिली परीक्षा नसून अशा आपण कितीतरी परीक्षा दिलेल्या आहेत. यापुढेही देणार आहोत. त्यामुळे मुलांनो, ताणतणाव विरहित परीक्षेला सामोरे जा”, असे प्रतिपादन फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विषयतज्ञ दमयंती कुंभार यांनी केले.

निरोप समारंभ कार्यक्रमात ताराचंद्र आवळे यांच्याकडे साऊंड सिस्टीम सुपूर्द करताना दहावी विद्यार्थी आणि विदयार्थीनी.
जिंती ता.फलटण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांच्या शुभचिंतन व निरोप समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजेंद्र रणवरे होते. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, प्राचार्य चंद्रकांत ढोबळे, पी.एन.रणवरे, एम.एन. रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“मोबाईल हे सध्याच्या पिढीचे व्यसन झाले असून त्यापासून दूर झाले पाहिजे व अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात करिअर केले तर निश्चितच आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो. तसेच उंच स्वप्ने मनात बाळगून ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. आपण सकारात्मक विचार करून दर्जेदार मानव बनणे अपेक्षित आहे”, असे प्राचार्य चंद्रकांत ढोबळे यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, पी.एन.रणवरे, एम.एन.रणवरे, नवनाथ रणवरे, पी.जे.जगताप, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तनया जगताप, जिया तांबोळी, उत्कर्षा रणवरे, वेदिका रणवरे यांनी मनोगत व्यक्त केली.
प्रारंभी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस साऊंड सिस्टीम भेट दिली. शिवांजली साळुंखे हिने आभार मानले.