स्पर्धा परिक्षेतील यशाबद्दल विठ्ठलवाडी येथे शेखर कोरडे व अंकिता शिंदे यांचा सत्कार संपन्न .
। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।
“ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षणाची कास धरावी. आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाने आपली सामाजिक उंची वाढते. यामुळे तरुणांनी शिक्षणावर भर देऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उत्तुंग यश संपादन करावे. तुमच्याच गावातील शेखर राजेंद्र कोरडे व अंकिता विशाल शिंदे या दोन तरुणांनी अतिशय संघर्ष करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोन्ही तरुणांचा आदर्श गावातील इतरही तरुणांनी घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवावे”, असे प्रतिपादन विठ्ठलवाडी (ता. फलटण) येथे शेखर कोरडे व अंकिता शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी व्याख्याते गिरीश बनकर यांनी केले.
यावेळी शेखर कोरडे व अंकिता शिंदे या दोघांचा सत्कार विठ्ठलवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आला. यावेळी लेखक विकास शिंदे, गोविंद भुजबळ, बापूराव शिंदे , विजय शिंदे , राहुल शिंदे, वैभव नाळे, अमोल रासकर, मयूर शिंदे, दत्तात्रय नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना अंकिता शिंदे यांनी सांगितले की, “लग्न झाल्यावर दहावी नंतरचे शिक्षण घेतले. पतीच्या आग्रहास्तव महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची परीक्षा दिली. दोन तीन प्रयत्न केल्यानंतर हे यश मिळाले. कुटुंबीयांनी खूप साथ दिली. आपण आपल्या मुलीला शिकवतो पण सुनेला कोण शिकवत नाही. मला माझ्या कुटुंबीयांनी शिकवले त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे.”
शेखर कोरडे यांनी, “आई वडीलांचे छत्र लहानपणीच हरवलेले असताना चुलते व कुटुंबीयांनी भावंडांसह शिक्षण दिले. कधीच आई वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. म्हणून या सत्काराचे खरे हक्कदार तेच आहेत”, असे मनोगत व्यक्त केले.
या वेळी दिगंबरदादा मेहेकरकर, अंकुश गायकवाड , नामदेव कोरडे, पोपट बोडके, जनार्धन बोराटे, दशरथ बनकर, ज्ञानदेव कोरडे, सोपान शिंदे, सचिन शिंदे, विशाल शिंदे इत्यादी उपस्थित होते. प्रीतम कोरडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार सुहास कोरडे यांनी मानले .