। लोकजागर । फलटण । दि. २३ फेब्रुवारी २०२५ ।
अॅग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, जाधववाडी (ता.फलटण) यांचे वतीने गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. संमेलनाचे यंदा ८ वे वर्ष आहे, अशी माहिती संमेलन संयोजक तथा अॅग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांनी दिली.
संमेलनाबाबत सविस्तर माहिती देताना प्रकाश सस्ते यांनी सांगितले की, साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू अप्रकाशित साहित्यिकांना साहित्याच्या प्रकाश झोतात आणणे, नवोदित साहित्यिक, नवकवी, तसेच महिलांना व साहित्यप्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.

या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविणे, विविध विषयांचे परिसंवाद घेण,े जागतिक महिला दिनानिमित्ताने तळागाळातील महिलांचा तसेच सामाजिक शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गुणगौरव करणे असे अनेक उपक्रम राबविले जातात.
सातारा जिल्ह्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने भरविणारी ही पहिलीच संस्था आहे. यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षा श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर या असून संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा कवियत्री, गझलकार सौ. सोनाली सुरेश ढमाळ या आहेत. तर संमेलनाच्या कार्याध्यक्ष नीलम पाटील आहेत.
संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, नातेपुते शाखेचे अध्यक्ष धैर्यशील देशमुख, सिताराम नरके (पुणे), श्री सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिह भोसले, प.पू. तपो निधी शिवयोगी नंदगिरी महाराज, प.पू. परशरामजी वाघ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
याच कार्यक्रमांमध्ये डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांना छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज साहित्य जीवन गौरव पुरस्कार, राजेंद्र घाडगे, ज.तु.गार्डे, डॉ.भीमराव मोरे यांना विशेष साहित्य सेवा पुरस्कार, तिरकवाडी (ता.फलटण) येथील श्रीमती कांताबाई संपतराव कोकरे यांना आदर्श माता पुरस्कार यासह निबंध स्पर्धा पारितोषिक, परिसंवाद, दिवाळी अंक पारितोषिक वितरण, काव्य संमेलन, डॉ. प्रसाद जोशी यांची प्रकट मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व साहित्यिक साहित्य प्रेमी तसेच साहित्य रसिकांनी या मेजवानीचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रकाश सस्ते यांनी केली आहे.