। लोकजागर । फलटण । दि. 0७ फेब्रुवारी २०२५ ।
शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २० जानेवारी २०२५ पासून राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना सुविधा देण्यात आलेली आहे.त्यानुसार राज्याची शिक्षण संस्थांनी आपल्या अधिनस्त शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोटलवर दि. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत जाहिरात देण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत पार पडलेल्या या चाचणीसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ६३ हजार ६१ उमेदवारांनी स्व – प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२’ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थश व खशजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता १ ली ते १२ वी करिता शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता टप्पा – 2 अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वच व्यवस्थापनांना पवित्र पोटलवर सुविधा देण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी शिक्षण संस्थांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. याबाबत काही अडचणी असल्यास या ईमेलवर [email protected] संपर्क साधावा, असेही आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.