कृषी विभागाच्या आकृतिबंधाविरोधात कृषी अधिकाऱ्यांचा एल्गार; २१ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा!

७ सप्टेंबरला पुण्यात भव्य धरणे आंदोलन; टप्प्याटप्प्याने लेखणी बंद व ॲप्लिकेशन्सवर बहिष्कार टाकणार.

। लोकजागर वृत्त । पुणे । ४ सप्टेंबर २०२६ ।

कृषी विभागातील सध्याचा अपारदर्शक व अतांत्रिक आकृतिबंध पूर्णपणे रद्द करून सर्वसमावेशक तज्ज्ञ समितीमार्फत नवीन आकृतिबंध तयार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघासह विविध कृषी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी केली आहे. याबाबत २८ ऑगस्ट रोजी कृषी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत संघटनांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी, युवक, कृषी पदवीधर तसेच वाढत्या कार्यव्यापानुसार सक्षम व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनांनी लावून धरली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ३ सप्टेंबरला लेखणी बंद, तर ७ सप्टेंबरला कृषी आयुक्तालय, पुणे येथे सामूहिक रजा घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबरपासून शासनाच्या सर्व ॲप्लिकेशन्सवर बहिष्कार, ११ सप्टेंबरला लॅपटॉप जमा, तसेच १५ ते १८ सप्टेंबरदरम्यान शासकीय सभा व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार घालण्यात येणार आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्यास २१ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. शेतकरी व कृषी क्षेत्राच्या हितासाठी राज्यातील सर्व कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलनात एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

Spread the love